१४ जून २०२३: योगिनी एकादशी

योगिनी एकादशीला विष्णु-शिव पूजेचा सुंदर योगायोग…
हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिव. दोघांना एकत्रित हरिहर म्हणतात. योगिनी एकादशीला विष्णूची पूजा केली जाते आणि त्या दिवशी सकाळपासून दिवसभर शिववास आहे. अशा स्थितीत ज्यांना योगिनी एकादशीच्या दिवशी रुद्राभिषेक करायचा आहे, ते सकाळपासून करू शकतात.

हिंदू कॅलेंडरनुसार, ह्या वर्षी ज्येष्ठ कृष्ण एकादशी १३ जून रोजी सकाळी ०९:२८ ते दुसऱ्या दिवशी १४ जून रोजी सकाळी ०८:४८ पर्यंत आहे. योगिनी एकादशी तिथी दोन्ही दिवशी पहाटे आहे, पण उदयतिथी महत्त्वाची असते. त्यानुसार बुधवार, १४ जून रोजी आषाढ कृष्ण एकादशीची उदयतिथी प्राप्त होत आहे. एकादशी त्या दिवशी सकाळी ०८:४८ पर्यंत आहे, परंतु योगिनी एकादशीचे व्रत १४ जूनलाच ठेवणे योग्य ठरेल. १३ जून रोजी सूर्योदयानंतर योगिनी एकादशीची तिथी सुरू होते.

१. योगिनी एकादशी सर्व पापं दूर करते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला कौटुंबिक आनंद देते.

२. या व्रतामुळे सर्व प्रकारचा उपद्रव नाहीसा होतो आणि आयुष्यात आनंद मिळतो.

३. योगिनी एकादशी व्रत केल्यास समृद्धी प्राप्त होते.

४. असे मानले जाते की हे व्रत केल्याने हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखे पुण्य मिळते.

५. हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश मिळते.

६. असे म्हणतात की या व्रताच्या परिणामामुळे, एखाद्याकडून मिळालेल्या शापातून मुक्तता मिळते.

७. ही एकादशी सर्व रोग आणि आजारांचा नाश करते आणि असे म्हटले जाते की सुंदर स्वरूप, गुण आणि प्रसिद्धी मिळते.

व्रत विधी: या व्रताच्या दिवशी इतर एकादशीच्या व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून भगवान विष्णूंची उपासना करावी. त्यांना तुळस व कमळ वाहावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूंना नमस्कार करून व्रत पूर्ण करावे आणि उपास सोडावा. शक्य असल्यास यथाशक्ती दानधर्म करावा, त्याने एकादशीचे पुण्य दुप्पटीने मिळते.

षष्ठीपूर्तीचे महत्व जाणून घ्या.

एकसष्ठी, म्हणजेच ६१ वा वाढदिवस. या दिवशी केल्या जाणाऱ्या पुजेला “उग्ररथ शांती” असेही म्हणतात. आपल्या घरातील व्यक्तीच्या वयाची ६० वर्षे पुर्ण झाल्यानंतर हा विधी केला जातो. साठी पार केलेल्या व्यक्तीचे पुढील आयुष्य निरोगी आणि समाधानी जावे तसेच दुःस्वप्न, पिशाच्चबाधा होऊ नये, कोणतेही वियोग सहन करण्याची मानसिक व शारिरीक शक्ती मिळावी व मनःस्वास्थ्य चांगले रहावे हा या शांतीचा मुख्य हेतू. या वेळेस मुख्यदेवता मार्कंडेयऋषी, सप्त चिरंजीव स्थापना, पुजन व अभिषेक केला जातो. तसेच वरील देवतांचा आशीर्वाद प्राप्त करुन घेण्यासाठी व उत्तम निरोगी दिर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी होम-हवन केले जाते. यावेळी तुलादान करण्याचीही प्रथा आहे. विशिष्ठ द्रव्याची तुला केल्यानंतर जमा झालेले धान्य किंवा उपयोगी वस्तू दान दिल्या जातात.


हळद घालुन मळलेल्या कणकेचे एकसष्ट दिवे एका ताटात घेऊन, त्या दिव्यांखाली रुपयाचे नाणे ठेऊन त्या दिव्यांनी त्या व्यक्तीचे औक्षण केले जाते. त्यानंतर श्रेयदान व यजमानाच्या ओटीत प्रसादाचा नारळ घातला जातो.

शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करावे कि नाही ?

अनेक कुटुंबांमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत केले जाते. परंतु यावर्षी ५ गुरुवार आले असुन शेवटच्या गुरुवारी दिवसभर चतुर्दशी असून सायंकाळी ७ वा. १५ मि. नी अमावस्या प्रारंभ होत असल्याने शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करावे कि नाही ? हा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. त्याचे पंचांगशास्त्रानुसार उत्तर असे कि, अमावस्या हा महिन्यातील शेवटचा दिवस असतो. या शेवटच्या गुरुवारी दिवसभर चतुर्दशी व सायंकाळी अमावस्या प्रारंभ होत असली तरी या शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणेच महालक्ष्मी पूजन व व्रत करावे.
शेवटच्या गुरुवारी अमावस्या लागते म्हणुन त्या गुरुवारी व्रत करणे चुकवू नये. त्यादिवशी देखील व्रत, पूजन, उपवास आवश्य करावा.

श्री कालभैरव जयंती

आज कार्तिक वद्य अष्टमी म्हणजे श्री कालभैरव जयंती आहे. कालभैरव अर्थात श्री भैरवनाथ हे शंकराचा अवतार असून खूप लोकांचे कुलदैवत तसेच ग्रामदैवत देखील आहे. कार्तिक महिन्याच्या वद्य अष्टमी दिवशी महादेवाच्या शरीरातुन कालभैरवांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवशी कालभैरव अष्टमी / कालाष्टमी खूप उत्साहात साजरी करतात. त्यामुळे उद्या आपल्या गावातील भैरवनाथाच्या दर्शनास अवश्य जा!! देवास गुलाल वाहुन नारळ फोडुन प्रदक्षिणा घालावी.

काळ्या रंगाचा कुत्रा हा काळभैरवचे लौकिकदृष्ट्या प्रतिक/वाहन मानला जातो. त्यामुळे काळ्या कुत्र्यास तुप लावलेली चपाती खाऊ घालावी. या दिवशी लोक कालभैरवाचे अष्टक पठण करतात किंवा कालभैरवास रुद्राभिषेक केला जातो.

श्री कालभैरव उपासना कशी करावी ?

१. कालभैरवास रुद्र अभिषेक करावा.
२. घरामध्ये नित्य सायंकाळी कालभैरव अष्टक वाचावे.
३. काळ्या कुत्र्यास दूध चपाती किंवा तूपलावलेली चपाती खायला घालावी.

श्री कालभैरवाष्टकम्।

देवराज्य सेव्यमान पावनाघ्रिपंकजम्।
व्यालयज्ञ सूत्रमिंदू शेखरं कृपाकरम्।
नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरम्।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ।।१।।

भानुकोटिभास्वरं भवाब्दितारकं परं।
नीलकण्ठमीप्सिथार्थ दायकं त्रिलोचनम।
कालकाल मम्बुजाक्ष मक्षशूलमक्षरं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।२।।

शूलटंक पाशदण्ड पाणिमादिकारणं।
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम।
भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।३।।

भुक्तिमुक्ति दायकं प्रशस्तलोकविग्रहं।
भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं।
विनिकण्वन्मनोज्ञ् हेम् किंकिणीलस्तकटिं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।४।।

धर्मसेतू पालकं अधर्ममार्ग् नाशकम्।
कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्।
स्वर्णवर्ण शेष् पाश शोभितांगमण्डलं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।५।।

रत्नपादुकाप्रभाभिराम पाद युग्मकम्।
नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्।
मृत्युदर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।६।।

अट्टहास भिन्नपद्म जाण्ड् कोश संततिं।
दृष्टिपात नष्टपाप जालमुग्र शासनं।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।७।।

भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं।
काशिवास लोकपुण्यपापशोधकं विभुम्।
नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।८।।

कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं।
ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्।
शोक मोह दैन्य लोभ कोपतापनाशनम्।
ते प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् धृवम् ।।९।।

इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं कालभैरवाष्टकम् संपूर्णम्।

तुळसी विवाह | तुळशीचे लग्न | तुलसी विवाह

तुळसी विवाह
महत्व :
विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा हा उत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करतात. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो.
भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे, तुळस ही लक्ष्मी चे रूप मानले जाते. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते.

शास्त्रीय कारण:
मानवी जीवनात तुळशीचे खूप महत्व मोठे आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचे नाश करते.
तुळस मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड हा विषारी वायू शोषून, शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करते. आयुर्वेदातही तुळशीला फार महत्व आहे.

ह्या दिवशी तुळशीच्या कुंडीला रंगरंगोटी करून तसेच सर्व सौभाग्य अलंकार चढवतात.बोर, चिंच, आवळा, सिताफळ त्यात ठेवतात. मांडव म्हणून उसाची खोपटी ठेवतात.
वेगवेगळ्या विभागप्रमाणे तुलसी विवाह साजरा करण्याची पद्धत आहे.

विधी व पूजा:
१.आचमन करून संकल्प केला जातो.
२.षोडशोपचारे गणपती पूजन केले जाते.
३.तुळशीची व कृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते.
४.तुळशीला सर्व सौभाग्य अलंकार अर्पण करतात.
५.त्यानंतर बाळकृष्ण व तुळस यांच्या मध्यभागी अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणतात.
६. महानेवेद्य व आरती करून मंत्रपुष्पांजली केली जाते.

तुळशीला आणि बालकृष्णला गोडाचा नैवेद्य व फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. घरातील सवाष्णी खण नारळ, सूपारीने तुळशीची ओटी भरतात.
ह्या दिवशी दीप उत्सव करून फटाके उडवून मोठया आनंदाने उत्सव साजरा करतात.

विधीयुक्त षोडशोपचारे तुलसी पूजन करण्यासाठी गुरूजी ऑन डिमांड च्या संकेत स्थळाला भेट द्या आणि तुलसी विवाह ची वेळ आजच नोंदवा.

तुलसीमातेची आरती:

जय देवी जय देवी जय माय तुळशी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे ‍तुळशी ।।धृ।।
ब्रम्हा केवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीथे शाखा परिवारी।।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी।।१।।

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।।२।।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।।
त्यासी देसी संतति संपति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी।।३।।

दीपावली भाग २

मागील भागात आपण वसुबारस व धनत्रयोदशी या दोन सणांची माहिती व महत्व पहिले. यानंतर दिवाळीत येणारे दोन दिवस म्हणजे नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन होय. या दुसऱ्या भागात नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन या दोन सणांचे महत्व वाचूयात.

३. नरक चतुर्दशी :
पुराणात अशी एक कथा आहे कि, नरकासुर नावाचा एक राक्षस देव व मानवांना पीडा देऊ लागला. त्याने अपहरण करून आणलेल्या सोळा सहस्त्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडले असता भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्या सर्व राजकन्यांना मुक्त केले. तेव्हा नरकासुराने मरताना श्रीकृष्णाकडे वर मागितला कि, “आजच्या तिथीला जो सूर्योदयापूर्वी मंगल स्नान करेल त्यास नरकाची पीडा होऊ नये.” यामुळे यादिवशी सुगंधित तेल उटणे लावून सूर्योदयापूर्वी मंगलस्नान केले जाते. तसेच पहाटे व सायंकाळी घरात सर्वत्र तेलाचे दिवे (पणती) लावले जातात.


तसेच अपमृत्यु येऊ नये म्हणून यादिवशी दुपारी बारा ते दोन या वेळेत कधीही, पूर्व दिशेस तोंड करून, पाण्यात तांदूळ घालून यमाच्या पुढील १४ नावांनी यमतर्पण करावे. म्हणजे पुढील एकेक नाव उच्चारत सरळ हातावरून ताम्हणात पळीने पाणी सोडत रहावे. (ज्यांना वडील नाहीत अशांनी तांदळा ऐवजी काळे तीळ घालून अंगठ्यावरून पाणी सोडावे.)


१. यमं तर्पयामी २. धर्मराजं तर्पयामी
३. मृत्युं तर्पयामी ४. अंतकं तर्पयामी
५. वैवस्वतं तर्पयामी ६. कालं तर्पयामी
७. सर्वभूतक्षयकरं तर्पयामी ८. औदुंबरं तर्पयामी
९. दध्नं तर्पयामी १०. नीलं तर्पयामी
११. परमेष्ठिनं तर्पयामी १२. वृकोदरं तर्पयामी
१३. चित्रं तर्पयामी १४. चित्रगुप्तं तर्पयामी


याप्रकारे तर्पण करून दक्षिण दिशेस तोंड करून पुढील श्लोक दहा वेळा म्हणावा.
श्लोक : यमो निहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च काल: ।
भूताधिपो दत्त कृतानुसारी कृतांत एतद्दशभिर्ज्यपंति ।।

४. श्री लक्ष्मी पूजन:
दिवाळीमधील सर्वात महत्वाचा असा हा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन होय. अश्विन अमावस्या यादिवशी घराघरात लक्ष्मीपूजन केले जाते. देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून १४ दिवसात १४ रत्न उत्पन्न झाली. त्यामध्ये प्रगट झालेल्या लक्ष्मी देवीने भगवान विष्णूंच्या गळ्यात माळ घालून श्रीविष्णूचरणाशी ती लीन झाली. ऋग्वेदातील उल्लेखानुसार ‘श्री’ व ‘लक्ष्मी’ या दोन देवता होत्या. परंतु पुढे श्रीदेवीने आपले अस्तित्व लक्ष्मीत विलीन केल्याने श्रीलक्ष्मी ही एकच देवता झाली.


श्रीलक्ष्मी ही संपत्तीची, धनधान्याची अधिष्ठात्री देवता असल्याने धनाच्या स्थिरतेसाठी व दारिद्रयनाशासाठी लक्ष्मीची पूजा केली जाते. श्रीलक्ष्मीदेवी अस्थिर व चंचल असल्याने ती आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी अश्विन अमावास्येच्या दिवशी सायंकाळनंतर तिची विधिवत पूजा केली जाते. यावेळी एका नव्या सतरंजी किंवा गालिच्यावर कलशपूजन व घरातील लक्ष्मीची पूजा मांडून, त्यापुढे आपण संचित केलेले धन व दागिने यांची पूजा केली जाते. या पूजेवेळी लक्ष्मीस व सर्व धनधान्य व दागिण्यास हळद कुंकू, धने, अक्षदा फुले, अत्तर याचबरोबर साळीच्या लाह्या, बत्तासे व डाळिंबाचे दाणे वाहिले जातात. श्रीसूक्ताचे पठन केले जाते. श्रीखंड, बासुंदी, पुरी, लाडू, करंजी इत्यादी पक्वान्नाचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते. यावेळी मांडलेल्या पुजेसमोर व घराबाहेर दिव्यांची आरास केली जाते, रांगोळी काढली जाते.


धर्मशास्त्रानुसार केरसुणी किंवा झाडू म्हणजे ‘आरोग्यलक्ष्मी’ समजली जाते. ही आरोग्यलक्ष्मी घरातील अलक्ष्मीला घराबाहेर काढून घरातील धनलक्ष्मी व आरोग्यलक्ष्मी स्थिर करते, म्हणून यादिवशी आवर्जून नवीन केरसुणी अथवा झाडूची पूजा केली जाते. पूर्वी अनेक ठिकाणी या अलक्ष्मीला घरातून हाकलून देण्यासाठी रात्री १२ वाजता घरातील स्त्रिया सूप आणि दवंडी वाजवून त्यांना हाकलून लावत. तसेच काही ठिकाणी आजही रात्री बारा वाजता नव्या केरसुणीने घर झाडून काढण्याची प्रथा आही. इतरवेळी रात्रीच्या वेळी घर झाडणे निषिद्ध मानले जाते.

संदर्भ- धर्मसिंधु, निर्णयसिंधू, दाते पंचांग.

दीपावली भाग एक

दीपावली हा सर्वांचा आवडता सण ! वसुबारस पासून सुरु होणारा हा उत्सव भाऊबीजे दिवशी संपतो . या सणाचे हे सहा दिवस आपण मोठ्या आनंदाने साजरे करतो. परंतु आपल्या धर्मशास्त्रात या प्रत्येक दिवसाचे एक विशिष्ट महत्व सांगितले आहे . ते समजून घेतले तर या सणाचा आनंद द्विगुणित होईल .

१. वसूबारस (गोवत्स द्वादशी)
आपली वेदकालीन संस्कृती हि कृषी प्रधान असल्याने आपल्या अनेक सण उत्सवात गोमातेचे महत्व अधोरेखित करून तिचे पूजन केले जाते .
दीपावलीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस . गाय ही आपल्याला मातेसमान असून आईच्या दुधानंतर आपल्याला गाईच्या दुधाचेच महत्व आहे. अश्या गोमातेचे पूजन करण्याचा दिवस म्हणजे वसूबारस अश्विन महिन्याच्या कृष्ण / वद्य पक्षातील द्वादशीस सवत्स धेनूची म्हणजे वासरासह गाईची पूजा केली जाते .

या दिवशी गाईच्या पायावर पाणी घालून व तिला हळदी कुंकू वाहून औक्षण केले जाते . तसेच गाईस उडीदाचे व इतर धान्याचे वड़े नैवेद्य म्हणून खायला देतात व ‘आमच्या घरात कायम दूध दुभती राहो व आम्हाला सदैव दूध व दुधाचे पदार्थ मिळो’ अशी प्रार्थना करून गाईस प्रदक्षिणा घातली जाते .

२. धनत्रयोदशी
दीपावलीचा हा दुसरा दिवस असून या दिवशी आपल्या घरातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्राचीन गुप्त) धनाची पूजा केली जाते. तसेच या दिवशी वैद्य डॉक्टर) श्री धन्वंतरी देवतेची पूजा करतात .
धर्म सिंधू ग्रंथात सांगितल्या प्रमाणे घरात कोणासही अपमृत्यु येऊ नये म्हणून आपल्या घराच्या बाहेरील बाजूस सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून कणकेचा दिवा लावला जातो व त्यावेळी पुढील श्लोक म्हणून प्रार्थना केली जाते .
श्लोक:
मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह।
त्रयोदशां दीपदानात् सूर्यज:प्रियतां मम ।।

सर्वपित्री अमावास्येचे महत्व

दिनांक २५/०९/२०२२ रोजी रविवारी भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या आहे.

सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस मानला जातो. भारतात बहुतांश भागात सर्वपित्री अमावस्येला महालय अमावस्या सुद्धा म्हणतात.

सर्वपित्री दिवशी कोणाचे श्राद्ध करता येते ?
जी व्यक्ती पौर्णिमा अथवा अमावस्येला मरण पावले असतील अश्या व्यक्तींचे श्राद्ध सर्वपित्रीला केले जाते. तसेच जर वेगवेगळ्या तिथींना मरण पावलेल्या पित्रांचे श्राद्ध त्या-त्या तिथींना करण्यास शक्य झाले नसेल तेंव्हा अशा सगळ्या पितरांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला करतात.
तसेच जर आपल्याला आपल्या पुर्वजांच्या मृत्युची तिथी माहिती नसेल अशा वेळी देखील आपण त्यांचे श्राद्ध या अमावस्येला करू शकतो. यामुळेच या अमावस्येला सर्वपित्री मोक्ष अमावस्या असे म्हणतात.

सर्वपित्रीदिवशी श्राद्ध का करावे ?
श्राद्ध कर्म केले असता धन, धान्य, कीर्ती, समृद्धी, आरोग्य, यश, स्वर्ग , पुष्टी, बल प्राप्त होते.
ह्या दिवशी आपल्या कुळाच्या वृद्धीसाठी, वंशवृद्धी व्हावी म्हणुन सपिंड श्राद्ध केले जाते. म्हणजेच या दिवशी ब्राम्हण भोजन व पिंड दान करून श्राद्ध केले जाते तसेच पुर्वजांच्या स्मरणार्थ तर्पण श्राद्ध , हिरण्य श्राद्ध, चट श्राद्ध सुद्धा केले जाते.
ह्यापैकी काही शक्य नसल्यास पुर्वजांच्या फोटोस नैवेद्य दाखवून पितृअष्टक म्हणावे.

🙏🙏🙏🙏🙏🙏
पितृअष्टक

जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला
पुढे वारसा हा सदा वाढविला
अशा नम्र स्मरतो त्या पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||
इथे मान सन्मान सारा मिळाला
पुढे मार्ग तो सदा दाखविला
कृपा हीच सारी केली तयांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||
मिळो सद् गती मज पितरांना
विनती हीच माझी त्रिदेवतांना
कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||
जोडून कर हे विनती तयांना
अग्नि वरूण वायु आदी देवतांना
सदा साह्य देवोनी उध्दरी पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ ||
वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना
सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना
मुक्तीमार्ग द्यावा ऊध्दरून त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||
करूनी सिध्दता भोजनाची तयांना
पक्वान्ने आवडीनें बनवून नाना
सदा तृप्ती होवो जोडी करांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||
मनोभावे पुजूनी तिला, यवाने
विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने
आशिष द्याहो आम्हा सकलांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||
सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा
न्यून काही राहाता माफी कराना
गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ |।

#गौरीपूजन: शास्त्र काय सांगते ?

भाद्रपद महिन्यात अनेकांकडे परंपरेनुसार गौरीपुजन केले जाते. या गौरी काहिजणांकडे धातुच्या किंवा मातीच्या स्वरुपात उभ्या तर काहींकडे तांब्यावर, सुगडावर किंवा खड्यांच्या असतात. ज्याच्याकडे पिढ्यानपिढ्या जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे गौरीपूजन करावे. त्यात बदल करु नये.

गौरी आवाहन मुहूर्त
भाद्रपद महिन्यातील गौरी बसवताना / आवाहन करताना त्या नेहमी “अनुराधा” नक्षत्रावर बसविल्या / पुजल्या जातात. अशावेळी वैधृती भद्रा विष्टी राहुकाळ इ.कुयोगांचा दोष नसतो. अनुराधा नक्षत्र असेपर्यंत गौरी बसवल्या जातात. उदा. गौरीआवाहनाच्या दिवशी अनुराधा नक्षत्र जर रात्रीपर्यंत असेल तर संपूर्ण दिवसभरात केव्हाही गौरी बसवल्या जातात. यासाठी विशिष्ट मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. यावर्षी रात्री १०.५६ पर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने संपूर्ण दिवसभरात कधीही गौरी आवाहन करावे.
गौरी आवाहनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन होते.म्हणजे बोली भाषेत “गौरी जेवतात”. यादिवशी कुलाचाराप्रमाणे पुजन करुन सवाष्ण जेऊ घालतात.

गौरी विसर्जन
गौरी विसर्जन हे मूळ नक्षत्रावरच होते. यासाठीही विशिष्ट मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. यावर्षी मूळ नक्षत्र रात्री ८ वा. ५ मि. पर्यंत असल्याने रात्री ८ पर्यंत केव्हाही गौरी विसर्जन करावे
संदर्भग्रंथ – दाते पंचांग व निर्णयसिंधु

पुत्रदा एकादशी

आज पुत्रदा एकादशी. विशेषकरुन संततीप्राप्तीसाठी या एकादशीचे व्रत केले जाते.

🚩 पुत्रदा एकादशीच्या दिवशी पुजन कसे करावे ?

सकाळी देवपुजा झाल्यानंतर अथवा माध्यान्हकालापर्यंत या व्रताची पुजा केली जाते. मनातली इच्छा बोलुन श्री कृष्णाच्या मुर्तीवर अक्षदा वहाव्यात. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मुर्तीला ताम्हणात घेऊन दुध पाण्याचे स्नान घालुन मुर्ती पुसुन देवघरात किंवा एखाद्या चौरंगावर ठेवावी. त्याला अत्तर लाऊन गंध, हळद, कुंकु तुळस फुले वाहुन पुजा करावी. उदबत्ती समई व तुपाचा दिवा लावावा. शेंगदाण्याच्या लाडुचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर श्रीकृष्णास १०८ तुळसीपत्र वहावीत. प्रत्येक तुळसीपत्र वाहताना “ॐ क्लीं कृष्णाय नमः” , या मंत्राचे उच्चारण करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. संपूर्ण दिवस उपास करावा.(फराळ केलेला चालेल)
या दिवसभरात कठोर बोलणे, भांडण करणे टाळावे.

दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे देवपुजा करुन श्रीकृष्णाला तुळस फुले वाहुन पुन्हा मनातली इच्छा बोलावी. गोडाचा (पुरणाचा) नैवेद्य दाखवुन आरती करावी. या दिवशी शक्य असेल तर एखाचे मेहुण (जोडपे) जेवायला घालावे. जर मेहुण जेवायला घालणे शक्य नसेल तर त्यांचे ताट वाढुन ते पान गाईला द्यावे व त्यानंतर आपण उपवास सोडावा.

पुढील मंत्राचा शक्य असेल तेवढा जप करावा.

ॐ देवकी सुत गोविन्द वासुदेव जगत्पते ।
देहि मे तनयं कृष्ण त्वामहम शरणम् गता ॥